कोल्हापूर, दि. १२ : कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्राला औद्योगिक, आयटी आणि पर्यटन क्षेत्रात नवी दिशा देणाऱ्या नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या प्रकल्पासाठी संवादातून सामंजस्याचा मार्ग काढला जाणार असल्याचे आश्वासन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिले आहे. “महामार्गामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील दळणवळण सुविधा मोठ्या प्रमाणात सुधारतील. त्यातून रोजगाराच्या संधी वाढणार असून भुदरगडसारखा दुर्गम भागही विकासाच्या मुख्य प्रवाहात येईल,” असे ते म्हणाले.
मुंबईत काल महामार्ग समर्थक शेतकरी प्रतिनिधी आणि प्रशासन यांची बैठक यशस्वीपणे पार पडली. या बैठकीत अनेक शेतकऱ्यांनी प्रकल्पास पाठिंबा दर्शवत भू-संपादनास मंजुरी दिल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले. “महामार्गाच्या विकासामुळे स्थानिक शेतकऱ्यांना शेतीमालाच्या बाजारपेठा उपलब्ध होतील. तसेच, औद्योगिक गुंतवणूक वाढल्याने जिल्ह्यात रोजगारनिर्मितीला गती येईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
विरोधकांकडून प्रकल्पाला केवळ राजकीय हेतूने विरोध होत असल्याची टीका करत आमदार क्षीरसागर म्हणाले, “शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न सुरू आहे. प्रत्यक्षात, अनेक शेतकरी या प्रकल्पाला सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. काहींनी तर आपल्या सातबारा उताऱ्यांची कागदपत्रेही प्रशासनाकडे सादर केली आहेत. त्यामुळे विकासाला विरोधासाठी विरोध करणे योग्य नाही.”
रुंदी फक्त १०० ते ११० मीटरच
महामार्गाची रुंदी ३०० मीटर असल्याच्या विरोधकांच्या आरोपांना फेटाळत आमदार क्षीरसागर म्हणाले, “रुंदी केवळ १०० ते ११० मीटर इतकीच आहे. शिवाय, रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी शेतकऱ्यांच्या वाहनांसाठी स्वतंत्र रस्त्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना बाजारभावानुसार योग्य मोबदला दिला जाईल.”
२०१९ आणि २०२१ च्या महापुराचा अनुभव लक्षात घेऊन पाण्याखाली जाऊ नयेत म्हणून पूरप्रवण क्षेत्रांमध्ये पिलरवर पूल उभारण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. तसेच, देवस्थान, ब वर्ग, पतसंस्थांच्या जमिनींसाठी विशेष तरतुदी करणार असून, त्या जमिनी कसणाऱ्याला न्याय्य मोबदला दिला जाईल, असे त्यांनी सांगितले.
“महाराष्ट्राचे क्षेत्रफळ जपान, दक्षिण कोरिया, जर्मनी या प्रगत राष्ट्रांच्या तोडीचे आहे. मात्र तिथे ८ हजार किलोमीटर लांबीचे एक्स्प्रेसवे आहेत. आपल्याकडे अशी मोठ्या प्रमाणात वाहतूक व्यवस्था हवीच. समृद्धी महामार्गाप्रमाणेच शक्तीपीठ महामार्गही औद्योगिक विकास, रोजगार आणि स्थानिक शेतीमालाला बाजारपेठ मिळवून देणार आहे,” असे क्षीरसागर यांनी स्पष्ट केले.
या पत्रकार परिषदेला शक्तीपीठ महामार्ग समर्थन समितीचे अध्यक्ष दौलतराव जाधव, माजी महापौर राजू शिंगार्डे, नवनाथ पाटील, अमोल मगदूम, सचिन लंबे, रोहित बाणदार, राम अकोळकर, दत्तात्रय कुलकर्णी, शिवसेनेचे कमलाकर जगदाळे, किशोर घाटगे आदी मान्यवर उपस्थित होते.