विशेष लेख कोमल वखरे
“खेड्याकडे चला” हा महात्मा गांधींनी दिलेला संदेश आजच्या काळात पुन्हा आठवून द्यावा लागेल अशी स्थिती देशात निर्माण झाली आहे. कारण गावं हळूहळू ओस पडत आहेत. आज गावात केवळ वयोवृद्ध मंडळी आणि थोडेफार प्रौढ लोक दिसतात; तरुणाई मात्र शहराच्या हवेत गुंग झाली आहे.
गणेशोत्सवात पोरांची गजबज, वर्गणी मागणाऱ्या टोळ्या, नवरात्रीत देवीसाठी पायी चालणारी तरुण मंडळी हे दृश्य आता केवळ आठवणीत राहिले आहे. मुलं-मुली दोघांनीही शहर गाठले आहे. मुलींसाठी पुणे म्हणजे शिक्षणाचं माहेर झालंय.
गावातली अंगणातली रांगोळी, पारावरच्या गप्पा, सामूहिक सण-उत्सवाची धांदल आता गायब होत चालली आहे. त्यांची जागा सोशल मीडियावरील शुभेच्छांनी घेतली आहे. मात्र गावं ओस पडण्यासाठी फक्त मोबाईल किंवा सोशल मीडिया जबाबदार नाहीत. या मागे दोन मोठी कारणे आहेत शिक्षण आणि रोजगार.
ग्रामीण भागात आवश्यक सोयीसुविधा नाहीत. उच्च शिक्षणासाठी मुलांना शहरात जावेच लागते. त्यासाठी होणारा खर्च शेतकरी वडिलांच्या तुटपुंज्या कमाईतून भागवावा लागतो. रूम-हॉस्टेलच्या खर्चासाठी कर्ज घ्यावं लागतं. या कर्जाच्या ओझ्यातून घरातील कर्ता पुरुष हळूहळू जगत असतानाच संपत जातो.
राजकीय नेते मात्र केवळ शेतकरी आत्महत्या मोजतात. पण या आत्महत्यांमागील खरी कारणं व्याजाचं कर्ज, शिक्षणाचा बोजा, रोजगाराचा अभाव याकडे लक्ष दिलं जात नाही. उलट ग्रामीण भागात जातीयवाद, घराणेशाही, राजकीय स्वार्थ, बॅनरबाजी यांमध्येच लोकं अडकून पडली आहेत.
आज आवश्यक आहे ती दर्जेदार शिक्षणव्यवस्था,व्यवस्थित वाहतूक व्यवस्था,आणि स्थानिक रोजगार निर्मिती.हे झालं तरच गाव पुन्हा जिवंत होईल. अन्यथा पुढील पिढीला गाव म्हणजे काय हे इतिहासाच्या धड्यातूनच समजावं लागेल.