कोल्हापूर : भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी शनिवारी कोल्हापूर येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळाला भेट देऊन अभिवादन केले. त्यांनी शाहू महाराजांच्या सामाजिक न्याय, शिक्षण आणि समानतेसाठी केलेल्या कार्याचे स्मरण करून त्यांना आदरांजली वाहिली. तसेच पुष्प अर्पण करून नतमस्तक होत शाहू महाराजांच्या कार्याचा गौरव केला.
या वेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचसाठी नियुक्त न्यायमूर्ती मकरंद कर्णिक, शिवकुमार दिघे, शर्मिला देशमुख, एस. जी. चपळगावकर, तसेच जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, मनपा आयुक्त आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.
शाहू महाराजांनी समाजातील सर्व घटकांसाठी शिक्षणाची दारे खुली करून सामाजिक प्रबोधनाचा मार्ग दाखवला. "सर्वांना समान न्याय" या तत्त्वावर आधारलेली त्यांची कार्यप्रणाली आजही सामाजिक न्यायाच्या क्षेत्राला दिशा देणारी आहे.
रविवारी (दि. १७) कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे उद्घाटन सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते होणार आहे.