स्नेहल तोडकर विशेष लेख
१५ ऑगस्ट १९४७ भारताने स्वातंत्र्य मिळवलं. परकीय सत्तेच्या बेड्यांतून मुक्त झालो, स्वतःच्या तत्त्वांवर उभं राहण्याचं स्वप्न पाहिलं. पण आज, ७८ वर्षांनंतरही एक प्रश्न मनाला टोचतो भारत स्वतंत्र झाला, पण महिलांना खरंच पूर्ण स्वातंत्र्य मिळालं आहे का?
होय, आजच्या भारतात महिला शिक्षण, नोकरी, राजकारण, क्रीडा, विज्ञान सगळ्या क्षेत्रात झळकत आहेत. आपल्याकडे महिला पंतप्रधान, राष्ट्रपती, अंतराळवीर, ऑलिंपिक पदकविजेत्या झाल्या आहेत. कायद्याने त्यांना मतदानाचा हक्क, शिक्षणाचा अधिकार, रोजगाराचा हक्क, विवाह व घटस्फोटाचे हक्क मिळाले आहेत.पण समाजाच्या वास्तवात अजूनही काही अदृश्य साखळदंड आहेत.आजही बालविवाह, हुंडा, स्त्रीभ्रूणहत्या, छेडछाड, घरगुती हिंसा हे शब्द केवळ बातम्यांपुरते नाहीत, तर अनेकांच्या रोजच्या आयुष्याचा भाग आहेत.रात्री उशिरा बाहेर पडताना महिलांना भीती वाटते, सुरक्षिततेचा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे.
अनेकांना अजूनही ‘कुटुंब’ आणि ‘करिअर’ यांपैकी एकाची निवड करायला भाग पाडले जाते.ग्रामीण भागात मुलींच्या शिक्षणापेक्षा लग्नाला प्राधान्य देणारी मानसिकता जिवंत आहे.म्हणजेच संवैधानिक दृष्ट्या महिला स्वतंत्र आहेत, पण सामाजिक मानसिकता अजूनही गुलामीच्या छायेत आहे.खरं स्वातंत्र्य तेव्हाच मिळेल जेव्हा
महिला निर्भयपणे रस्त्यावर चालू शकतील
स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतील
आणि समाज त्यांना लिंगभेदाशिवाय स्वीकारेल
स्वातंत्र्य दिन साजरा करताना हा प्रश्न आपण विसरू नये आपला देश स्वतंत्र झाला, पण आपल्या महिलांची स्वप्नं अजूनही बेड्यांत नाहीत ना?